बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

वाढदिवस !

का मित्राचा वाढदिवस विसरलो म्हणून सहजच गेला महिना पडताळून पहिला आणि लक्षात आलं कि गेल्या महिन्यात तीन वाढदिवस होऊन गेले . 

पहिला वाढदिवस आपल्या सर्वांच्या नित्य वापरातल्या "गुगल" चा . यांत्रिक गोष्टीचा वाढदिवस साजरा झाला. . जगभरात 'गुगल'चा  वाढदिवस मोठ्या दिमाखात वेगवेगळ्या पद्धतीने जरा केला गेला . 

दुसरा वाढदिवस म्हटलं तर फार मोठा आणि म्हटलं तर . . . . 
असो, आपल्या देशाचे लाडके (?) पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांचा वाढदिवस हि झाला . 

गल्लीबोळातल्या नेत्यांच्या वाढदिवसाला शेकडो फ्लेक्स लावून शहर बकाल करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपला सर्वोच्च नेता आणि त्यांच्या वाढदिवसाचाही सोयीस्कर विसर पडावा , हि खूप मजेशीर अशी बाब आहे. 
पण आपल्या या सर्वोच्च नेत्याला  दिल्ली दरबारी  दिल्या जाणाऱ्या  वागणूकीचाच कित्ता सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी,स्थानिक नेत्यांनी  गिरवल्याचे दिसले . निदान या एका बाबतीत तरी दिल्ली पासून गल्ली पर्यंत 'एकात्मतेचे' अभिनव दर्शन देशाला या निमित्ताने घडले . 

तिसरा वाढदिवस - २ ८ सप्टेंबर ! या दिवसाचं महात्म्य खूप मोठ … 
ज्वलंत आणि जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या अशा एका महान क्रांतिकारकाचा जन्मदिवस . 

शहिद  भगत सिंग- नुसत नाव घेतलं तरी त सळसळून उठत आणि छाती अभिमानाने भरून येते . 
   
महिन्याच्या पहिल्या तारखेची आतुरतेने वाट बघणारा या देशातला युवा वर्ग गेल्या महिन्यात मात्र भारतमातेच्या चरणावर आपलें  प्राण अर्पण करणाऱ्या या थोर देशभक्ताला विसरला होता . 

त्यामुळे शहिद भगत सिंगांच्या जन्मदिनी मला प्रकर्षाने 'गुलाल' या हिंदी चित्रपटातले एक विडंबन गीत आठवले . . . 

" आज का लौंडा ये केहता . .  हम तो बिस्मिल थक गये  !

  अपनी आझादी तो भय्या , लौंडिया कि दिल में हैं .. 

  सरफरोशी की तमन्ना अब ना  किसी के दिल में हैं  !!! "  

भारतमातेच्या स्वतंत्रतेकरिता आपल्या  प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारकाच्या वाटेला हि उपेक्षा यावी. . यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं ? 
पण नेत्यांचे ,नट-नट्यांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या नव्हे तर त्यांची मंदिरे उभारणाऱ्या समाजाकडून काय अपेक्षा करावी ?

या तीन ही वाढदिवसात एक साधर्म्य मात्र नक्कीच आहे. 
गुगल ' या शोध यंत्राचा 'यंत्रवत' वाढदिवस . देशाच्या सर्वोच्च (?) नेत्याला 'यंत्रवत' असल्याची जाणीव करून देणारा वाढदिवस आणि बधिर झालेल्या समाजमनाने 'यंत्रवत'पणे "न" साजरा केलेला एका अन क्रांतिकारकाचा वाढदिवस !

नट नट्या- सिनेतारकांच्या वाढदिवसाला त्यांच्या कारकीर्दीचं भरभरून वर्णन करणाऱ्या इलेक्ट्रोनिक मिडियालाही या तीनही वाढदिवसात टीआरपी नसल्याने फारसं लक्ष द्यावसं वाटलं नाही . 

शहिद भगतसिंगांच्या  जयंती समारोहाच्या एखाद  दुसऱ्या कोपऱ्यात झालेल्या कार्यक्रमापेक्षा "  ग्रांड मस्ती " ला आजचा युवक तुडूंब गर्दी करत होता . 

'शोकांतिका' हा शब्दही थिटा पडावा , अशीहि आजची विदारक परिस्थिती  आहे.

आज जर रामप्रसाद बिस्मिल हयात असते तर त्यांनी शहीद भगतसिंगांना नक्की विचारलं असतं कि "ते" कोणतं स्वप्न होतं 'भगत ' जे तू  या देशासाठी इथल्या लोकांसाठी पाहिलं होतस ?

ज्या स्वराज्यासाठी तू लढलास . . त्याचं आजचं हे भीषण वास्तव बघण्यासाठी तू थांबायला हव होतसं भगत !

मित्रानों , आज तर काही लोक यापेक्षा इंग्रजाचं राज्य बरं होतं असे म्हणू लागले आहेत . 
काय वाटत असेल हे ऐकून भगतसिंगांच्या  आत्म्याला . . . 

खादीचे कपडे परिधान केलेल्या राजकीय नेत्यांना गांधीजींच्या फोटो असलेल्या नोटांचे घातले जाणारे हार . . 
इंग्रजांच्या क्रिकेट मध्ये उद्योगपतींनी पैसे लावून  घेतलेल्या कोंबड्यांच्या झुंजी …. 
मस्तवाल धनिकांच्या व नट नट्यांच्या बेफाम गाडीखाली चिरडले मरणारे  निष्पाप जीव ….
कॅश -करप्शन-क्रिमिनल या "सी " कल्चरने व्यापून गेलेलं राजकारण . . . . . 
भ्रष्टाचारात आकंठ बुडालेलं सरकार . . . . 
माता -भागिनींवर राजधानीतच होणारे पाशवी बलात्कार . . . . 
गुंडांना समाजात मिळणारी प्रतिष्ठा .. 
मूल्यांच अध:पतन आणि नैतिकतेचा झालेला ऱ्हास . . . 

. . आणि हे सारं काही टी.व्ही वर "एन्टरटेनमेंट "म्हणून बघणारा या देशाचा तटस्थ नागरिक  .  .   . 

खरच, हे सगळं पहायला आज भगतसिंग हवे होते का ? 

क्रांतिकारकांच्या असीम त्यागापेक्षा नट नट्यांच्या ,सिनेतारकांच्या अनैतिक संबंधानाच जिथे बहुचर्चित प्रतिष्ठा आहे . 
जिथं गुंड हे समाजसेवक आहेत ,त्यांना समाजात मोठा मान आहे. जिथं विनासायास आणि फुकट मिळालेली गोष्ट म्हणजे "स्वातंत्र्य" आहे . 
अशा समाजातून राष्ट्रप्रेमाने भारावलेली नवीन पिढी आपण कशी निर्माण करणार आहोत ? 

सुखासाठी ' स्वातंत्र्याचे ' व आरामासाठी ' आझादीचे ' दान करू पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. 
पाश्चिमात्यांच्या 'भोग ' संस्कृतीची पकड कायम आहे . 
गोरे गेले . . . . काळे आले ! 
परंतू इंग्रजांची प्रवृत्ती कायमच आहे . . . . म्हणूनच "चलेजाव " किंवा "करेंगे या मरेंगे " हे आंदोलन आजही संपलेले नाही . 

मित्रांनो , ज्या नरदुर्गांनी आपल्या सर्वस्वाची होळी करून आपल्या प्राणांची आहूती दिली . त्यांचीच स्वप्नं आज पायदळी तुडवली जातायत  .  . 

हे स्वातंत्र्य , हि हुतात्म्यांची स्वप्नं घट्ट धरून ठेवावीत आणि त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपल्या परीनं झटाव असं कुणालाच कसं वाटत नाही ?

पगाराच्या तारखेची वाट बघत जगणारे आम्ही,  'ज्यांच्यामुळे ' आजचा हा दिवस बघतो आहोत त्यांची साधी जन्मतारीख सुद्धा लक्षात ठेवू शकत नाही . त्याचं बलिदान ,त्यांचा असीम त्याग  आमच्या लक्षात राहत नाही . 

कारण , आम्ही " भागांवाला "नाही आहोत ! 

आम्ही या  देशाचे सर्वात करंटे  आणि नालायक सुपूत्र आहोत .  .  . 







टीप  : - ( " भागांवाला "- सौभाग्यशाली - शहिद भगतसिंग यांचे लहानपणीचे नाव .)