गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

दाभोळकर "प्रसन्न" !

डॉ . दाभोळकरांना जाऊन महिना उलटून गेल्यावरही "तपास" चालू आहे .
डॉ . दाभोळकर गेल्यानंतरचा "साधना"चा पहिलाच अंक ! मुखपृष्ठ पाहिलं अन मनात विचारांचे काहूर उठलं …
… अस काय आहे त्या मुखपृष्ठावर ? गडद काळ्या पार्श्वभूमीवर शुभ्र अक्षरांमध्ये लिहिलं होतं कि ,
" स्वातंत्र्यासाठी प्राण देणारी अनेक माणसे महाराष्ट्राने पहिली आहेत .  समतेच्या वेदीवरही अनेकांनी प्राणार्पण केले आहे. पण ज्ञानविज्ञानाच्या महतीसाठी प्राणाची कुरवंडी ओवाळणारा 'नरेन्द्र दाभोळकर ' हा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा आहे ! "
…मन एकदम महिनाभर मागे गेलं .  खरच , डॉक्टरांच्या निर्घुण हत्येने आमच्या समोर काही यक्ष प्रश्न उभे केले होते. परंतू , तशीच काही उत्तरही मिळाली . 
निद्रिस्त समाजमनाला अंत:र्मुख करणारी घटना ! असं या हत्येचं वर्णन केलं तर वावग ठरणार नाही .
जादूटोणा कायद्याचा १४ वर्षाचा वनवास संपला … पण त्यासाठी डॉ . दाभोळकरांच्या कुटुंबियांना आणि पर्यायाने समाजाला फार मोठी किमंत मोजावी लागली .
सरकारने ४८ तासात कायदा मंजूर केला . पण मग १४ वर्षं हे विधेयक का लटकल होतं ?
डॉ . दाभोळकरांच्या बलिदानाच्या वज्रदंडावरच पुरोगामी समतेच्या महाराष्ट्राची ध्वजा फडकणे कितपत योग्य आहे ?
हे प्रश्न वेदना निर्माण करणारे आहेत .
 ४८ तासात निर्णय घेणाऱ्या आणि अजूनही दाभोळकरांचे मारेकरी पकडू न शकलेल्या सरकारवर चहुबाजूने टीकेची झोड उठवली जात आहे .
अशा परिस्थिती मध्ये एका अजाण भीतीने किंवा राजकारण्यानांही भय वाटावं अशा मिडीयाच्या अनिर्बंध शक्ती पुढे नतमस्तक होऊन सर्व काही गप्पपणे बघणाऱ्या सर्वसामन्यांपैकी मीही एक …
डॉ . दाभोळकरांच्या हत्येनंतर विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाने बजावलेली भूमिका जशी प्रशंसनीय आहे . तेवढीच आक्षेपाह्र्यहि आहे !

डॉ . दाभोळकरांच्या कार्याचा महाराष्ट्राला करून दिलेला परिचय . त्यांचा त्याग ,त्यांचे बलिदान, त्यांचा विचार हा जसा सर्वसामान्यांपर्यंत या वृत्तवाहिन्यांनी पोहचवला .

तसाच ' डॉ . नरेन्द्र दाभोळकर' हा टीआरपी  FACTOR हि बनवला !!!
अधिक खोलात गेल्यास मी जे काही धाडसी विवेचन इथे करतो आहे ,त्याला मिडिया मधील तज्ञ मंडळीही दुजोरा देतील .. नव्हे तर , मिडिया मधील माझ्या काही मित्रांनी त्यांच्याच भाषेत "ऑफ द रेकॉर्ड " या गोष्टीची पुष्टीही केली आहे.
याच टीआरपी च्या ओढीने पुरेसा अभ्यास नसलेले अनेक मिडिया विचारवंत पुरोगामी विचारवंताच्या बुद्धीजीवी वर्गाचे आपणच प्रतिनिधी आहोत अशा आविर्भावात वावरू लागले .
वादग्रस्त विधाने करून अधिकाधिक व्ह्यूवरशीप " आपल्याला कशी मिळेल ,यासाठी विविध हातखंडे वापरू लागले .
सोशल मिडीयाचा गैरवापर समजतील अपप्रवृत्तीच घेतात यात काही अंशी तथ्य असले तरी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले हे तथाकथित विचारवंतही घेत आहेत.   

डॉ. दाभोळकरांच्या निर्घुण हत्येनंतर मिडीयावर चर्चा करणाऱ्यांपैकी एक आघाडीचा चेहरा म्हणजे श्री .प्रसन्न जोशी . यांनी आपल्या फेसबुक वॉल वर वादग्रस्त विधानांनी खचाखच भरलेला नवा कोरा लेख लिहिला आणि अपेक्षेप्रमाणे विरोध तसेच त्यांच्या बाजूने बोलणारे असे दोन गट तयार झाले . प्रतिक्रियांचा पाऊस पडला , इप्सित साध्य झाले !
मध्य पूर्वेतील देशांमध्ये सोशल मिडीयाने तेथील क्रांतिकारी उठावास कसा हातभार लावला ,याची रसभरीत वर्णने याच माध्यमांनी आपल्या पर्यंत यापूर्वी पोहोचवली आहेत .
सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना आपल्यावरही एक सामाजिक एकतेची जबाबदारी आहे याचे भानही या मंडळीनी राखले पाहिजे .

सदरच्या लेखात जोशीबुवांनी " माझा सार्वजनिक गणेशोत्सव आणि रस्त्यावरच्या सार्वजनिक अथर्वशीर्षास विरोध आहे . " असे जाहीर करून टाकले .
…. आणि नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वृत्तांकनामधे हेच महाशय त्यांच्या वृत्तवाहिनी मधे अगदी विसर्जनाच्या दिवसापर्यंत आघाडीने दिसले . नव्हे तर , ' सेलिब्रेटी गप्पा' या कार्यक्रमात अभिनेता श्री स्वप्निल जोशी यांच्याशी शकुन-अपशकून च्या गप्पा मारतानाही त्यांना जनतेने पाहिले .
ज्या सार्वजनिक अथर्वशीर्षास विरोध त्यांनी दर्शविला होता . त्याचेच वृत्तांकन त्यांच्याच लोकप्रिय वाहिनीने केले .
पुरोगामी विचाराचा सच्चा पायीक असल्यासारखे "पुरोगामी -पुरोगामी " असा एकसारखा टाहो फोडणारे हे क्रांतिकारी विचारवंत स्वत: कार्यरथ असलेल्या संस्थेस मात्र परावृत्त करू शकले नाही .
सार्वजनिक गणेशोत्सवाचे वार्तांकन करताना या सगळ्या वृत्तवाहिन्यांना दाभोळकरांच्या विचाराचा सोयीस्कर विसर पडलेला दिसला . अनेक गणपती हे कसे नवसाला पावणारे आहेत , कुठल्या भक्ताने किती सोने देऊन नवस फेडला. याची रसभरीत वर्णने या वाहिन्यांवर दाखवली जात होती .       

या घटनाक्रमामुळे मला लहानपणी पाठ्यपुस्तकात असलेला "महापुरुषांचा पराभव " हा धडा आठवला !
महापुरुषांचे तथाकथित अनुयायीच कसे त्यांच्या विचारांचा पराभव करतात ,यावर हा धडा होता .
महात्मा फुले , राजश्री शाहू महाराज ,डॉ. आंबेडकर , गाडगेबाबा , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्वच महापुरुषांनी अनिष्ठ प्रथा ,चाली-रिती यांच्या विरोधात प्रबोधन केले .

महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला .

परंतु अंधश्रद्धा या केवळ गोर गरीब , अशिक्षित अथवा ग्रामीण भागाशीच संबंधित आहेत , या मताशी मी असहमत आहे .
जागतिकीकरणाच्या या युगामध्ये जीवघेणी स्पर्धा , नित्याचे ताण-तणाव, हताश झालेले मन आणि त्यातून आलेली अगतिकता यामुळे शहरी उच्चशिक्षित वर्गही या अनिष्ठ प्रथांमध्ये गुरफटत चालला आहे .
उच्चशिक्षितांच्या मानसिक दुबळेपणाचा , कमकुवत मनोवृत्तीचा गैरफायदा घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत . माझ्या ओळखी पैकीच एखाद्याचे सांगायचे झाल्यास , पदव्युत्तर शिक्षण आणि एका मोठ्या आय. टी कंपनी मधे कामाला असलेल्या माझ्या एका परिचिताने पती -पत्नी मधील लैंगिक अडचणीकरिता डॉक्टर ऐवजी एका बुवाचा दरवाजा ठोठावला होता . नुसताच दरवाजा ठोठावून हे महाशय शांत बसले नाहीत तर आपली सद्सद्विवेकबुद्धि गहाण टाकून बुवा महाराजांचा अलौकिक (?) स्पर्श झालेल्या अंगारयाची पुडी रात्री पत्नीच्या शरीरात ठेवून आले.

अजून एक अचंभित करणारा किस्सा या " आय टी वाल्या " मंडळींमध्ये सर्वश्रूत आहे .
'अमेरिकेचा विजा' मिळावा याकरिता हैदराबाद जवळील "चिल्कूर" या गावाला आपल्या पासपोर्ट ची झेरॉक्स प्रत ठेवून "नवस" बोलणारे शेकडो उच्चशिक्षित मी पहिले आहेत .
" विजा बालाजी " च्या मंदिरा मध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी हि उच्चशिक्षितांची गर्दी काय दर्शविते ?
केवळ कायद्यासाठी पाठपुरावा करून नव्हेतर कायदा संमत करून घेऊन आपली जबाबदारी संपली आहे का ?
या कायद्यात बसणाऱ्या कृत्यांबद्दल पिडीत व्यक्तींनी पुढ यावं याकरिता काही ठोस पावलं उचलावी लागणार आहेत .
न्यायमूर्ती रानडे , स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञानवादी समाजनिर्मितीचा ध्यास घेतलेले आणि विवेकाची  पताका खांद्यावर घेऊन चालणारे खरे वारकरी डॉ . नरेन्द्र दाभोळकर होते .
श्रद्धा-अंधश्रद्धा आणि अध्यात्म याही पलीकडे जाउन आपण "एका" विचाराचा सन्मान करणारे जाणते नागरिक कधी बनणार आहोत ?  हा विचार ज्याचा त्याने करायचा आहे .

 मित्र हो, आपली श्रद्धा हि अखंड तेवत राहणाऱ्या नंदादिपासारखी असली पाहिजे , ती श्रद्धा आपल्याला 'प्रकाश' देते.. एवढेच नव्हे तर , ती भोवतालीही प्रकाश पसरविते  !

श्रद्धा हे उन्नतीचे माध्यम वा साधन आहे . अधोगतीला नेते ती अंधश्रद्धाच ! !
अन्याय ,अत्याचार ,अनीती, अनिष्ठ प्रथांनी भारलेल्या या देशात जे 'महाभारत' चालू आहे . त्यामधे "विचार" हे पांडवांचे प्रतिक आहे, तर 'विकार' हे कौरवांचे रूप आहे आणि "विवेक" नावाची शक्ती म्हणजे आज चा "श्रीकृष्ण आहे ! या श्रद्धा-अंधश्रध्येला आरूढ करून घेणारं आपलं मन हेच खंर "कुरुक्षेत्र " आहे.
मनाच्या या कुरुक्षेत्रावर विजय मिळवण्यासाठी विवेक नावाच्या शक्तीला विचारांची जोड दिल्यास दाभोळकर निश्चितच "प्रसन्न" होतील !

४ टिप्पण्या: